भंडारदऱ्यात धुवांधार पाऊस, पाणीसाठा 80% वर स्थिर, धरण भरल्यात जमा…!
पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा भंडारदरा दौरा चर्चेत…!
-भंडारदरा प्रतिनिधी.
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात शनिवार सायंकाळपासून धुवांधार पावसाचे आगमन सुरू झाले असून रात्रभर पाऊस धो धो कोसळत आहे. त्यामुळे परिसरातील सर्वच ओढे नाले भरभरून वाहू लागले असून धरणात एका रात्रीत जवळपास पाऊन टीएमसी पाणी जमा झाले आहे. धरणातून 9000 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले असून धरणाची लेव्हल 80% चे जवळपास स्थिर ठेवण्यात येत आहे. तर धरण भरल्यात जमा असून पावर हाऊस मधूनही पाणी सोडले जात आहे. निळवंडे धरणाची पाणी क्षमता ही 80% वर पोहोचली असून निळवंडे धरणामधूनही जवळपास नऊ हजार क्युसेकने प्रवरा नदीपात्र आणि कालव्यांना पाणी सोडण्यात आलेले आहे. एकंदरच धुवांधार पावसाने परिसरातील जनजीवन गारठले असून आदिवासी बांधवांनी शेकोट्यांचा आधार घेतल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. अशातच भातशेतीच्या आवण्यांची कामेही सगळीकडे चालू झाली आहेत.

पर्यटकांची शनिवार रविवार भंडारदरा परिसरात प्रचंड झुंबड उडालेली दिसत आहे. शेंडी तसेच रंधा फॉल स्पिल वे परिसरात ट्रॅफिक जाम होत आहे.


काल पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व राज्यमंत्री नामदार भोईर यांचा भंडारदर्यात दौरा आला. त्यांचे समवेत जिल्हा पोलीस प्रमुख व जलसंपदाचे सर्वच अधिकारी या परिसरात आले होते. आमदार अमोल खताळ तसेच आमदार किरण लहामटे हे दोन्ही आमदारही विखे साहेबांसोबत उपस्थित होते.


पालकमंत्र्यांचे हस्ते यावेळी डॅम वरील शासकीय विश्रामगृहावर फर्स्ट क्लास बंगला येथे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणानंतर नामदार विखे यांनी या बंगल्याची पाहणी केली. तीन-चार वर्षांपूर्वी नूतनीकरण केलेल्या बंगल्याची दुरावस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. लाखो रुपये या बंगल्यावर नुकतेच खर्च करण्यात आले असून पुन्हा त्याचे नूतनीकरणाचे इस्टिमेट बनविण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता जलसंपदा स्वप्निल काळे यांनी पालकमंत्र्यांना सांगताच पालकमंत्र्यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. मला न विचारता यापुढे कुठल्याही कामाची इस्टिमेट बनवु नका, तुमचा मनमानी कारभार थांबवा, अन्यथा मला तुमच्याबाबत विचार करावा लागेल असे त्यांनी काळे यांना सुनावले. कार्यकारी अभियंता काळे यांच्या मनमानी कारभाराला सर्वच अधिकारी वैतागले असून त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी जनतेमध्ये व तसेच खालच्या कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येत आहे. काळे यांच्या कार्यकाळात प्रचंड निकृष्ट दर्जाची कामे झाली असून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता काळे यांची तातडीने या ठिकाणाहून बदली करावी अशी मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली.
